ठाणे : ‘तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून सरकारी कामांमध्ये पारदर्शकता ठेवून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना जलद गतीने देण्यासाठी प्रयत्न करावेत. शासकीय सेवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करण्याचे कर्तव्य पार पाडावे. आपण जनतेचे सेवक असल्याची भावना कायम मनात दृढ ठेवून सर्व प्रकारच्या प्रलोभनांपासून दूर राहावे,’ असे आवाहन पोलीस अधीक्षक (अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे) डॉ. महेश पाटील यांनी केले. ठाणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचारी वर्गासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
‘ईमानदारी - एक जीवनशैली’ ही संकल्पना घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) यंदा ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ राबवला जात आहे. एक नोव्हेंबर २०१९ रोजी नियोजन भवनात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद हातोटे म्हणाले, ‘शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक नागरिकाचे काम कोणत्याही अडवणुकीविना आणि तत्परतेने, पारदर्शीपणे कसे होईल यासाठी प्रयत्न करावेत. लाच घेणे आणि देणे हा गुन्हा आहे. आपण शासकीय सेवक आहोत, याचे भान ठेवून आपली सेवा बजावायला हवी.’
या वेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, तहसीलदार राजेंद्र चव्हाण (महसूल) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शेषराव बढे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संगीता भागवत, कार्यकारी अभियंता (लघुपाटबंधारे) इंदुरकर, कार्यकारी अभियंता (बांधकाम) पालवे, पोलीस उपअधीक्षक (एसीबी) मदन बल्लाळ, पोलीस उपअधीक्षक शशिकांत चांदेकर, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राठोड, पोलीस निरीक्षक रणजित पठारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी शिवाजी पाटील आणि अशोक पाटील यांनी भाषणे झाली. पोलीस उपअधीक्षक (एसीबी) मदन बल्लाळ यांनी भ्रष्टाचार निर्मूलनासंदर्भात तयार करण्यात आलेल्या विविध लघुचित्रफिती आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या दृकश्राव्य माध्यमातील प्रतिक्रिया उपस्थितांना दाखवल्या. हा सप्ताह २८ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. या निमित्ताने लाचलुचपत विभागांतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.